आंबा बागायतदारांची कर्ज माफ करा; जिल्ह्यातील आंबा बागायतदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी : मागील सात वर्षांपासून जिल्ह्यातील 11 हजार 326 आंबा बागायतदारांचे 223 कोटी 86 लाख रुपये कर्ज थकित आहेत. कोरोनामुळे बागायतदार कर्जाच्या खाईत गेले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफ करावीत यांसह अन्य महत्वाच्या नऊ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंबा बागायतदारांतर्फे देण्यात आले. त्यावर स्वतंत्र बैठक घेऊन बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री शिंदे यांची आंबा बागायतदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. या वेळी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे प्रदीप सावंत, प्रकाश साळवी, प्रसन्न पेठे, आनंद देसाई आदी बागायतदारांनी आंबा बागायतदारांच्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. कोरोनातील दोन वर्षे गंभीर परिस्थिती होती. त्यापूर्वी आठ वर्षे निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वसामान्य आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे. आंबा बागायतदारांची संख्या 1 लाख 9 हजार 747 आहे. 2014-15 पासून आंबा उत्पादक शेतकर्‍यांवर आलेली गंभीर संकटे आणि त्यामधून मार्ग काढण्यासाठी अद्याप चर्चा घडून आलेली नाही. अवकाळी पाऊस आणि उष्ण हवामानाने उत्पादन घटत आहे. यावर उपाययोजना आवश्यक आहे. हंगामातील आंब्याला हमीभाव मिळणे आवश्यक आहे. खरेदीदाराकडून आंब्याचा दर 40 ते 50 रुपयांपर्यंत मिळाला पाहिजे. प्रभावी कीटकनाशके व बुरशीनाशके बागायतदारांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. वानरांकडून बागाच्या बागा उध्दवस्त केल्या जात आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत.जिल्हा बँकांकडून कमी दरात म्हणजे चार टक्के दराने कर्जे मिळावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सध्याच्या विमा योजनेचा फार उपयोग होत नाही. ती सदोष आहे. त्यात बदल करावेत. कृषिपंपांच्या वीजबिलात झालेली वाढ रद्द करावी आणि बागांसाठीचे पंप कृषी म्हणून मान्यता द्यावी. कोकणातील आंबा बागायतदारांची कजमुक्ती करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या, गेल्या हंगामात फळमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने आंबा नाशवंत झाला. त्याचा सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी, यावर संशोधन करून उपाययोजना करून दिलासा द्यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.
रत्नागिरीतील प्रगतशील आंबा व्यावसायिक मुदस्सर मुकादम यांनी एक डझन आंब्याची पेटी मुख्यमंत्री ना. शिंदे यांना भेट दिली. तर कोकणी मेव्याचा बॉक्सही भेट देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button