
फगर वठार येथील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह सापडला; दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
रत्नागिरी : खालचा फगर वठार येथील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह भगवती किल्ल्यासमोरील 200 फूट खोल दरीत सोमवारी आढळून आला. तिने आत्महत्या केली की, तिचा घातपात झाला, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पती रितेश घाणेकर यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. गुरुवार 29 सप्टेंबर रोजी पत्नी तन्वी घाणेकर (वय 33) ही सायंकाळी 7.15 वा. सुमारास घरातून निघून गेली होती. मुलगी आनंदी हिला, “मी बाजारात जाऊन येते. उशीर झाला तर जेवण करून घ्या”, असे सांगून दुचाकी (एमएच 08 एक्स 7116) वरून बाजारात गेली होती. दुसर्या दिवशी दुपारपर्यंत ती घरी न आल्याने पती रितेशने पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा तन्वीची दुचाकी भगवती किल्ल्यानजीक आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. त्यानुसार दिवसभर पोलिसांना मृतदेह आढळून आला. पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले, पोलिस उपनिरीक्षक महाले व इतर कर्मचारी यांनी सायंकाळी माऊंटेनिअर्स असोसिएशनच्या पथकाला मदतीने रोपच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.