
राजापुरात मुसळधार पावसाचा जोर कायम; अर्जुना-कोदवली नद्या धोक्याच्या पातळीवर, बाजारपेठेला पुराचा धोका
कोकणासह राजापूर तालुक्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरालगत वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे शहरातील सखल भाग आणि बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण झाला आहे.
नद्यांमधील वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी किराणा माल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अन्य मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यातील अनेक ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना दैनंदिन हालचालींमध्ये अडचणी येत आहेत. काही ग्रामीण रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
दरम्यान, या पावसामुळे भात लागवडीसह खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेगाने सुरू केली असून यंदा चांगल्या उत्पादनाची आशा व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या राजापुरात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतीला मोठा फायदा होत असला, तरी दुसरीकडे संभाव्य पूरस्थितीचे संकट गडद होत असल्याने प्रशासन, व्यापारी आणि नागरिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.




