कोकणात शिक्षक म्हणून लागायचे आणि बदली करून आपापल्या जिल्ह्यात निघून जायचे… मग इथल्या जि. प.शाळांमध्ये शिकवणार कोण? आणि म्हणे गुणवत्ता ढासळली

रत्नागिरी : सध्या जिल्हा बदली करून जाण्यासाठी 405 जण तयार असून परजिल्ह्यातून अवघा एकच शिक्षक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाला आहे. त्या शिक्षकाला हजर करून घेण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा जिल्हा बदलीचा विषय सध्या चर्चेत आला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या बदलीप्राप्त शिक्षकांच्या यादीत जिल्ह्यातील 405 जणांचा समावेश आहे. असे असले तरी जिल्ह्यात 15 टक्के पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने त्यांना न सोडण्याचा निर्णय सध्यातरी जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.  प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने केली जात आहे. त्याची प्रक्रिया मागील महिन्यात पूर्ण झाली होती. प्रथम आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील 989 शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन माहिती भरली होती. त्यातील 405 शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरले. सर्वाधिक शिक्षकांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसह आजूबाजूच्या जिल्हा परिषदांची मागणी केली होती.
जिल्हा परिषदेच्या पावणेतीन हजार शाळांमध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांची दहा टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमातील शिक्षकांची 6 हजार 689  पदे मंजूर असून त्यातील 5 हजार 750 पदे भरलेली आहेत. 939 पदे रिक्त आहेत. 14.4 टक्के हे प्रमाण आहे. उर्दू माध्यमात 477 पदे मंजूर असून 390 भरलेली आहेत. 87 पदे रिक्त असून हे प्रमाण 18.24 टक्के आहे. केंद्र प्रमुखांची 251 पैकी 82 पदे भरली गेली आहेत. 169 पदे रिक्त असून 67.33 टक्के प्रमाण आहे. मुख्याध्यापकांची अवघी 19 पदेच भरलेली आहेत. मंजूर 66 पैकी 47 म्हणजेच 71.21 टक्के पदे रिक्त आहेत.
आंतरजिल्हा बदलीने मागील प्रकियेवेळी मंजूर तीनशे जणांना अजूनही रिक्त पदांमुळे बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही. यंदा त्यात 405 जणांची भर पडली आहे. पात्र शिक्षकांना परजिल्ह्यात सोडले तर रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त पदांमध्ये मोठी भर पडेल. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button