
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या आवारातील वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
रत्नागिरी : शहरातील वाहतूक पोलिस मुख्य रस्त्यावरील वाहतूक बाजूला ठेवून जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन वाहन चालकांवर कारवाई करत आहेत. याबाबत वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील हेल्मेट सक्तीचा विषय जोरदार गाजला होता. हेल्मेट सक्तीवरून काही सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांनीही याला विरोध दर्शवला होता. हे प्रकरण अगदी मंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यानंतर शहरात कारवाई करताना शिथिलता आणली गेली. वाहतूक पोलिसांनी सध्या नो-पार्किंगचा आधार घेत वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्य रस्त्यावरील कारवाई केली जात असतानाच आता वाहतूक पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हा परिषद आवारातही कारवाई सुरू आहे. जिल्हा परिषद आवारात सध्या नूतन इमारतीचे काम सुरू आहे. यामुळे कार्यालयीन कामासाठी येणार्या ग्रामस्थांना वाहने कुठे लावायची? असा प्रश्न पडतो. सध्या आवारात जिथे जागा मिळेल तिथे वाहन पार्किंग केले जात आहे. मात्र या गोष्टीला वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. वाहनांचे फोटो काढले जात आहेत. नो-पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यामुळे दंडाची पावती फाडली जात आहे. बहुसंख्य वाहन चालकांना ही पावती मोबाईलवर
येते. या सर्व प्रकाराबाबत वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.