
मावळते जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मांडला कामांचा लेखाजोखा
रत्नागिरी : पुढील पन्नास वर्षे लक्षात राहील, अशी विकासकामे गेल्या 364 दिवसांच्या जि. प. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केली. यामध्ये 58 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी आणि जलजीवन मिशन अंतर्गत 100 कोटींच्या कामांचे मंजुरी मिळवण्यात यश आल्याचे मावळते अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अध्यक्षपदाच्या दालनात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उपाध्यक्ष उदय बने, सभापती परशुराम कदम, चंद्रकांत मणचेकर, भारती सरवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत आदी उपस्थित होते. विकासकामांचा लेखाजोखा मांडताना विक्रांत जाधव म्हणाले, अंजनवेलमधून (गुहागर) निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेता झालो. मागील तीन अध्यक्षांपेक्षा 364 दिवसच मिळाले. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 58 कोटी आणले. इमारतीचे कामही सुरु झाले. तालुकानिहाय दौर्यामुळे समस्या समजल्या. नवोदय विद्यालयातील (राजापूर) स्थानिक मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न सुटला. यंदा 80 पैकी पन्नास टक्के मुले स्थानिक असून जिल्हा परिषद शाळांतील वीस आहेत. कोरोना कालावधीत रुग्णवाहिकांची कमतरता जाणवली. 57 प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका आणली. पाणीपुरवठा विभागातील 31 कर्मचार्यांच्या प्रलंबित वेतनासाठी राज्य शासनाकडून 31 लाखांची तरतूद करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांकडे पाठपुरावा केला, असे जाधव म्हणाले.
www.konkantoday.com