
शिवसेनेचे पालकमंत्री अनिल परब यांना काँग्रेसच्या भानुदास माळी यांचा इशारा
रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते काम घेऊन जातात. मात्र पालकमंत्री त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. शिवसेनेत या मगच तुमचे काम करू, असे सांगत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे हे पालकमंत्र्यांनी लक्षात ठेवावे आणि ही भूमिका त्यांनी बदलावी. अन्यथा काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात आम्ही हेच धोरण स्वीकारु, असा इशारा काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे. रत्नागिरी काँग्रेस भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असूनही काँग्रेसला शिवसेनेकडून दुजाभाव मिळत असून विकासकामे घेऊन जाणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे केली जात नाहीत. जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. परब यांनी ही भूमिका बदलावी अशी अपेक्षा माळी यांनी व्यक्त केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनीही या विषयाला दुजोरा दिला.




