
खाजगी परवानाधारक किंवा अवैध सावकार यांच्याकडून कर्ज प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांच्या पिळवणूकीस पायबंद बसावा यासाठीरत्नागिरी जिल्ह्यात पोलिस दलातर्फे जनजागृती मोहीम
जून महिन्या मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण मधील खाजगी सावकाराविरूध्द कर्जाऊ रक्कमेच्या परतफेडीसाठी बेकायदेशीरपणे शिविगाळ, दमदाटी व मारहाण करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सध्या चिपळूण पोलीसांकडून सुरू आहे.
या प्रकरणावरून खाजगी परवानाधारक किंवा अवैध सावकार गरजू व्यक्तीने त्यांच्याकडून कर्जाऊ घेतलेल्या रक्कमेच्या परतफेडीसाठी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून कर्जदार व्यक्तींची पिळवणूक करत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे खाजगी परवानाधारक किंवा अवैध सावकार यांच्याकडून अशा प्रकारच्या सर्वसामान्य नागरिकांच्या पिळवणूकीस पायबंद बसावा व त्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने डाॅ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, संगमेश्वर, जयगड, पूर्णगड, चिपळूण, गुहागर, सावर्डे, अलोरे-शिरगाव, खेड आणि दापोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून दिनांक 01 जुलै 2021 ते दिनांक 12/07/2021 या कालावधीत या अनुषंगाने नागरिकांसाठी जनजागृती/ प्रबोधनासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर वेळी उपस्थित नागरिकांना बेकायदेशीर वा अवैध सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने लागू केलेल्या महाराष्ट्र सावकारी (नियमन)अध्यादेश 2014 या कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच या कायद्यातील तरतुदींनुसार परवानाधारक सावकारांनी शेतक-यांना पिकासाठी व शेतीसाठी कर्ज देताना त्यांची स्थावर मालमत्ता तारण म्हणून घेता येत नसून कर्जाच्या मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेता येत नाही, शासनाने निश्चित केलेले व्याजदर आकारणे बंधनकारक असल्याचे तसेच कर्जदाराच्या खात्याचा हिशोब सावकाराने ठेवणे आवश्यक असून कर्जदाराने मागणी केल्यास कर्ज खाते उतारा देणे सावकारास बंधनकारक असल्याची सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली आहे. कर्ज घेताना कोणत्याही को-या कागदावर, स्टॅम्प पेपरवर वा इतर को-या कागदपत्रांवर सह्या न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शक्यतो नागरिकांनी सहकारी संस्था, सहकारी बॅंका आणि राष्ट्रीयकृत बॅन्का यांच्याकडूनच कर्ज घ्यावे, शासनाकडून पीककर्ज नियमित परतफेड करणा-या शेतकरी कर्जदारास विशिष्ट मर्यादेपर्यंत शून्य टक्के व्याज व त्यापुढे अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध आहे, अगदीच अपरिहार्य कारणामुळे सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आली तरच सावकार हा परवानाधारक असल्याची खात्री करून मगच कर्ज घ्यावे आणि अशा सावकाराकडून फसवणूक अथवा उपद्रव होत असल्यास त्वरित नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा सहाय्यक निबंधक यांच्याकडे संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com