
…तर चुन्याने खड्डे भरून आम्हाला चुना लावा’ : शौकतभाई मुकादम
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे जर पावसाळी डांबराने भरूनही टिकत नसतील, तर ते खड्डे चुन्यानेच भरा आणि जनतेलाही चुना लावा. मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी जसा वर्षानुवर्षे चुना लावला जात आहे, तसाच खड्डे भरतानाही लावा असा उपरोधिक शब्दात माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी प्रशासनावर व ठेकेदार कंपनीवर निशाणा साधला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, खड्डे भरण्याच्या कामाच्या दर्जावर आता तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य अवघ्या दोन दिवसांत वाहून जात असल्याने वाहनचालकांचा संताप वाढत आहे. चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी या प्रकारावर जोरदार टीका करीत, महामार्गावर भरलेले खड्डे दोन दिवसही टिकत नाहीत. नेमके कोणते पावसाळी डांबर किंवा साहित्य वापरले जात आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.




