
मुसळधार पावसामुळे तळे महसोबाची वाडीचा रस्ता तीन ठिकाणी खचला; तातडीच्या दुरुस्तीची मागणी
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळे महसोबाची वाडी येथील रस्ता मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याने ही समस्या वारंवार उद्भवत आहे.
रस्त्यावरील दरडी हटविणे, आवश्यक ठिकाणी नवीन मोऱ्या बांधणे, विद्यमान मोऱ्यांमधील मलबा काढणे तसेच रस्ता पुन्हा खचू नये यासाठी खालच्या बाजूस संरक्षक भिंत (रिटेनिंग वॉल) उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या रस्त्याची तातडीने आपत्कालीन दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना किंवा वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




