मुसळधार पावसामुळे आंबा घाटातील रस्त्याला भेगा; आमदार किरण सामंत यांनी घटनास्थळी केली पाहणी

साखरपा/आंबा घाट : गेल्या दोन आठवड्यांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतूक व्यवस्थेलाही बसू लागला आहे. कोल्हापूर–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात काही ठिकाणी रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आंबा घाटातील रस्ता धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळताच लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आपल्या नियोजित दौऱ्यात बदल करून तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची सविस्तर माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान रस्त्यावर पडलेल्या भेगा, पावसामुळे झालेली जमिनीची हालचाल आणि संभाव्य धोका याची त्यांनी पाहणी करून परिस्थिती गांभीर्याने घेतली. घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासोबत आज सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्याच्या सुरक्षिततेचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्ती, वाहतुकीसंदर्भातील पुढील नियोजन तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

स्थानिक नागरिकांनीही रस्त्यावरील भेगांबाबत चिंता व्यक्त करत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळणे, माती खचणे आणि रस्त्याचे नुकसान होण्याच्या घटना वाढत असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

आंबा घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याने रस्त्याची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असून, पुढील निर्णयाकडे वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button