जगबुडी नदीत दुर्दैवी दुर्घटना; सुट्टीसाठी गावी आलेल्या तिघा सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू


रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. या दुर्घटनेमुळे खेड शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तिघे सख्खे भाऊ मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास आहेत. सुट्टीनिमित्त ते खेड येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते.

बुधवारी दुपारच्या सुमारास हे तिघे भाऊ आणि त्यांच्यासोबत आणखी एक नातेवाईक जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही अडचणीत सापडले. खोल पाण्यात अडकल्यानंतर त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहामुळे त्यांना किनाऱ्याकडे पोहोचणे शक्य झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर एका युवकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र आकाश, नरेश आणि कैलास कांबळे या तिघा भावांना वाचवता आले नाही. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. एकाच कुटुंबातील तिघा भावांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button