
जांभारी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत नाही.
रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथे घडलेल्या गंभीर गावठी बॉम्बस्फोट प्रकरणाला सात ते आठ दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या तपासाला अद्याप ठोस दिशा मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर जिवंत गावठी बॉम्ब सापडूनही अद्याप एकाही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली असून, पोलिसांच्या तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जांभारी फाटा परिसरात मंगळवार दि. १९ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. वाटद पोलीस चौकी हद्दीत राहाणार्या रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५) या जंगल पमिरसरात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या असताना त्यांना संशयास्पद वस्तू दिसली. ती वस्तू हातात उचलताच अचानक जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात त्यांच्या डाव्या हाताची बोटे तुटली असून, त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. जयगड पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉम्ब शोधक पृथक, श्वानपथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. या तपासादरम्यान तब्बल २५ ते २९ जिवत गावठी बॉम्ब आढळून आल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. मात्र एवढ्या मोठ्याप्रमाणावर स्फोटके सापडूनही तपासात अद्याप कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. हे बॉम्ब नेमके कोणी तयार केले, कोणत्या उद्देशाने जंगल परिसरात लपवून ठेवले आणि त्यांचा वापर कशासाठी होणार होता, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर समोर आलेले नाही. या प्रकरणामागे एखादे मोठे रॅकेट किंवा गुन्हेगारी टोळी कार्यरत आहे का अशी चर्चाही आता स्थानिकांमध्ये सुरू झाली आहे.www.konkantoday.com




