
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामानात बदल होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. राज्यात एका बाजूला उष्णतेची लाट कायम असताना दुसऱ्या बाजूला मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.गुरुवारी राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांना उष्णतेची लाट आणि वादळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला होता. आता 29 मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेच्या तडाख्यानंतर वादळी पावसाचं संकट निर्माण झाल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात सध्या उष्ण आणि दमट हवामान कायम असून मुंबईसह अनेक भागांत प्रचंड उकाडा जाणवत आहे. गुरुवारी कोकणातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र शुक्रवारी कोणत्याही जिल्ह्यासाठी विशेष सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेला नाही. तरीही कमाल तापमान 30 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असून आर्द्रतेचं प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास अधिक जाणवू शकतो. दरम्यान, कोकणात मान्सूनपूर्व पावसासाठी वातावरण अनुकूल होत असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत




