
राज्यातील सर्व प्रवासी वाहतूक चालकांना आता आर्थिक कर सुरक्षा कवच
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्थापन केलेल्या कल्याणकारी मंडळाच्या नियमावलीत आणि नावामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. या ऐतिहासिक सुधारणेमुळे आता केवळ ऑटो-रिक्षा किंवा टॅक्सी चालकांपुरताच हा लाभ मर्यादित न राहता, राज्यातील सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणार्या चालकांना या मंडळाचे लाभ घेता येणार आहेत. शासनाने या मंडळाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढवून राज्यातील लाखो प्रवासी वाहतूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. याबाबतचे अधिकृत शासन शुध्दीपत्रक २० मे २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, कल्याणकारी मंडळाच्या सभासदत्वाच्या पात्रतेमध्ये अतिशय महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे.
आता सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे आणि वैध ’बॅज’ असणारे सर्वच अनुज्ञप्तीधारक चालक या मंडळाचे सभासद होण्यासाठी पात्र ठरले आहेत. यामुळे ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसह इतर सर्व व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणार्या चालकांचाही कल्याणकारी योजनांमध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे मंडळाच्या लाभाची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढली असून, राज्यातील हजारो नवख्या व अनुभवी चालकांना सामाजिक व आर्थिक सुरक्षेचे कवच मिळणार आहे.
www.konkantoday.com



