
कातळशिल्पे हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचाअद्भुत प्राचीन वारसा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
‘युनेस्को’सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने दखल घेतलेली अश्मयुगीन कातळशिल्पे हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अद्भुत वारसा आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे, अशी भावना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडोपी कातळशिल्प ठिकाणी व्यक्त केली. जिल्ह्यातील कातळशिल्प ठिकाणाला भेट देणाऱ्या त्या पहिल्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळशिल्प संशोधनाचा पाया घातलेले अभ्यासक आणि निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी अलीकडेच श्रीमती धोडमिसे यांची भेट घेऊन त्याना याबाबत माहिती देऊन कुडोपीला भेट देण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी कुडोपी येथील ‘बाहुल्यांचे टेंब’ या ठिकाणी भेट देऊन कातळशिल्पांची पाहणी केली. कुडोपीच्या कातळसड्यावर तीन समुहात विखुरलेली ८० हून अधिक कातळशिल्पे त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पाहून त्याचे बारकावे जाणून घेतले. कडक उन्हाची पर्वा न करता जिल्हाधिकारी त्या परिसरात सुमारे दोन तास होत्या. श्री. लळीत यांनी त्याना कातळशिल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, सां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मालवणचे तहसीलदार शेखर लव्हे, कवयित्री डॉ. सई लळीत सहभागी झाले होते.
पाहणी केल्यानंतर प्रतिक्रीया देताना जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, केवळ सिंधुदुर्गच्या नव्हे तर संपूर्ण कोकणच्या प्रागैतिहासाच्या दृष्टीने ही कातळशिल्पे महत्वाची आहेत. कोकणची प्राचीन संस्कृती, या परिसरात अश्मयुगीन काळात नांदलेल्या संस्कृती, तत्कालीन मानवी समुहाच्या वर्तनपद्धती यांचे दर्शन त्यातून घडते. पर्यटनाच्या दृष्टीनेही ती फार महत्वाची आहेत. ही कातळशिल्पे जपणे, त्या ठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण नक्की पावले उचलू, असे त्या म्हणाल्या.
या दौऱ्याबाबत व्यक्त होताना कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत म्हणाले की, जिल्हाधिकारी यांची ही भेट अत्यंत स्वागतार्ह आणि महत्वाची आहे. मी गेली २५ वर्षे या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न करीत आहे. आता खुद्द जिल्हाधिकारी यांनीच इथे भेट दिल्याने कातळशिल्पांचे संरक्षण, इथे येण्यासाठी रस्ता, अन्य प्राथमिक सुविधा याना चालना मिळेल, याची खात्री आहे. बुधवळे-कुडोपी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आपण याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे लवकरच सादर करणार आहे. यासाठी जिल्हा विकास मंडळाकडून पर्यटन विकासासाठी निधी प्राप्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.
बुधवळे-कुडोपीचे सरपंच संतोष पानवलकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि कुडोपीला भेट दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी पंचायत सदस्य प्रशांत पडवळ, ग्रामस्थ राजेंद्र हिर्लेकर, अशोक वाळवे. महेश पडवळ आदी उपस्थित होते.




