
रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला गती ! भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार
*रत्नागिरी, दि. ३ – कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण व सुरक्षा क्षेत्राच्यादृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाकरिता उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दल (ICG) व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मर्या. (MADC) यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) संपन्न होणार आहे. हा सोहळा रविवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील टी.आर.पी. परिसरातील ‘हॉटेल सावंत पॅलेस हॉल’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला पालकमंत्री तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री मा.ना.डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्यासोबतच गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला
लोकसभा सदस्य नारायण राणे, सुनिल तटकरे, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, विधानसभा सदस्य शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत, प्रशासकीय अधिकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, MADC दीपक कपूर, द कमांडिंग ऑफिसर कुणाल सी. नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल , मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
विमानतळाच्या या सामंजस्य करारामुळे केवळ नागरी विमान वाहतुकीलाच नव्हे, तर किनारपट्टीच्या सुरक्षेला आणि स्थानिक पर्यटनाला देखील मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म.वि.वि.कंपनी मर्यादितचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




