
सोनं खरेदी बंद, पेट्रोल जपून वापरा! PM मोदींच्या सल्ल्यावर राहुल गांधींची जळजळीत टीका, ”लोकांनी काय…”
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी इंधन, खाद्य तेलाच्या काटकसरीचे आवााहन देशवासियांना केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. इंधन टंचाईपासून ते देशाच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जळजळीत टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल त्यांनी मते मांडली. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह अनेक देश जागतिक संकटाला तोंड देत असताना सुजाण नागरिक म्हणून आपण काही गोष्टी करायला हव्यात. पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळावी, परदेशी प्रवास टाळावा तसेच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले.
राहुल गांधी यांची बोचरी टीका…
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर जळजळीत टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलेले आवाहन हे त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे. मागील १२ वर्षात देशाची स्थिती भयंकर केली असून आता लोकांनी काय करावं, काय करू नये, काय खावं, कुठं जाऊ नये हे लोकांना सांगावं लागत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.




