
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जलसाठे आटले, पाणीटंचाई गडद
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर बनू लागले आहे. कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, नद्या, धरणे, विहिरी आणि इतर जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत जिल्ह्याला मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून, अनेक गावांमधील विहिरींनी आताच तळ गाठला आहे. विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी महिलांना लांब अंतराची पायपीट करावी लागत आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून काही कालावधी बाकी असतानाच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी वर्गही चिंतेत आहे. जिल्ह्यातील बागायती शेती, विशेषतः हापूस आंबा आणि काजू बागांना पाणी देताना मोठी कसरत करावी लागत आहे.www.konkantoday.com




