
जागतिक हिवताप दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात जनजागृती, प्रतिबंधात्मक उपक्रम व उत्कृष्ट कर्मचारी गौरव समारंभ उत्साहात संपन्न
रत्नागिरी : दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस “जागतिक हिवताप दिन” म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचे घोषवाक्य “हिवताप दुरीकरणासाठी कटीबद्ध : आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे” असे असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने विविध जनजागृतीपर, प्रतिबंधात्मक व गौरवपर उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात आरोग्य कर्मचाऱ्यांनी हिवताप जनजागृती गीत सादर केले तसेच “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या अभियानाविषयी विशेष सादरीकरण करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी तसेच परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सहभागातून हिवताप जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली.
उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (सन २०२५–२६) वितरण:
किटकजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्तांची नावे पुढीलप्रमाणे :
आरोग्य पर्यवेक्षक : एल. जी. पुजारी, ए. ए. खान, सौ. सुजाता गोरे
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी : सौ. सोनाली कांबळे, सौ.सोनल काष्टे , सौ. वृषाली शेरे, विक्रांत वांद्रे
आरोग्य निरीक्षक : विजय जानवलकर, दत्ताराम पड्याळ, सुनील जानवलकर, राजेश कोळेकर
आरोग्य सेवक : मनीष साळवी, अनिल धोपटे, अंबादास शिंदे, प्रवीण गुरव, हर्षवर्धन व्यवहारे, संदीप ढेकणे
आस्थापना विभाग : महेश पवार, गणेश पवार, मंगेश मोहिते
वर्ग ४ कर्मचारी : सौ. विजया नार्वेकर, निलेश महाडिक
क्षेत्र कर्मचारी : विकास सावंत, विजय घडशी, सचिन जाधव, सूर्यकांत धावडे
आशा स्वयंसेविका : सौ. उर्मिला उमेश तळेकर
या उपक्रमांमुळे जिल्ह्यात किटकजन्य आजारांविषयी जनजागृती वाढून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास निश्चितच मदत होणार आहे. नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये,आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा ,तसेच तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले.
हिवताप व डासजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता दैनंदिन सर्वेक्षण, ताप रुग्ण शोध मोहीम, किटकशास्त्रीय सर्वेक्षण, पाणीसाठ्यांची तपासणी, अळी नियंत्रण तसेच मान्सूनपूर्व तयारीवर विशेष भर देण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागात किटकनाशक फवारणी, धुरफवारणी, “कोरडा दिवस” पाळण्याचे आवाहन आणि आरोग्य शिक्षणाद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांत हिवताप व डेंग्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली.




