मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा ठाम इन्कार


महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, विविध घडामोडींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री गुप्त भेट झाल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती.एका सोशल मीडिया पोस्टच्या आधारे ही माहिती समोर आली होती, ज्यामुळे विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली.

सूत्रांच्या हवाल्याने ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया संस्थेने दावा केला होता की, दोन्ही नेत्यांची ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी रात्री उशिरा भेट झाली. मात्र या कथित भेटीमागील नेमकं कारण स्पष्ट न झाल्याने चर्चांना अधिकच खतपाणी मिळालं. अनेकांनी या भेटीचा राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची असल्याचं म्हटलं.

दरम्यान, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा ठाम इन्कार केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, उद्धव ठाकरे यांना भेटायचं असेल तर त्यासाठी कोणतीही गुप्तता ठेवण्याची गरज नाही. अशा भेटी उघडपणे घेता येतात आणि त्यात लपवण्यासारखं काहीच नसतं, असं त्यांनी नमूद केलं.

फडणवीस यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, प्रत्यक्षात अशी कोणतीही भेट झालेली नाही. काही जण जाणीवपूर्वक चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अशा खोट्या सोशल मीडिया हँडल्सवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय चर्चांना वेगळं वळण मिळालं असून, आगामी निवडणुकांपूर्वी वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button