
रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण १ मे महाराष्ट्र दिनी करण्याच्या हालचाली,नगरपालिकेची जुनी इमारत जमीनदोस्त
रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण १ मे महाराष्ट्र दिनी करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू असून, याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नगरपालिकेची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. नव्या इमारतीत पालिकेचे कामकाज स्थलांतरित आले आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गेल्या अनेक दशकांपासून उभी असलेली ही वास्तू केवळ एक प्रशासकीय इमारत नव्हती, तर रत्नागिरीच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींची साक्षीदारही होती. नगरपालिकेचे कामकाज दीर्घकाळ या इमारतीतूनच पार पडले. शहराच्या विकासाचे अनेक महत्त्वाचे निर्णय, धोरणे आणि योजना याच ठिकाणी आकाराला आल्या होत्या. त्यामुळे या वास्तूशी शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, माजी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला होता.
जुन्या इमारतीच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीतून आता पालिकेचे कामकाज सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे, नगर पालिका आपल्या स्थापनेच्या १५० व्या वर्षात प्रवेश करत असतानाच ही आधुनिक इमारत कार्यान्वित होत आहे.
दरम्यान, वाढत्या शहराच्या गरजांना प्रतिसाद देत रत्नागिरी आता आधुनिक प्रशासनाच्या दिशेने ठाम पावले टाकताना दिसत असून, या नवीन इमारतीमुळे नागरिकांना अधिक जलद आणि सुसज्ज सेवा मिळतील, तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीतही अधिक गती आणि पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करत आहे.




