
स्मार्ट मीटर सक्तीचे; नवे नियम लागू
भारत सरकारने देशभरातील सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरचा वापर अनिवार्य केला असून यासंदर्भातील सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या (मीटर बसविणे आणि संचालन) नियम, २००६ मध्ये बदल करून ही अंमलबजावणी करण्यात येत आहे.
नवीन नियमांनुसार, ज्या भागात कम्युनिकेशन नेटवर्क उपलब्ध आहे, त्या ठिकाणी सर्व ग्राहकांना ठराविक कालावधीत स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक असेल. अशा भागांमध्ये वीजपुरवठा केवळ स्मार्ट मीटरद्वारेच केला जाईल. तर ज्या भागात नेटवर्क उपलब्ध नाही, तेथे राज्य वीज नियामक आयोगांना प्रीपेड मीटर बसवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सुधारित नियमांमध्ये प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधा (एएमआय) प्रणालीमध्ये प्रीपेड सुविधा असणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच सर्व प्रणाली परस्पर सुसंगत राहातील यावर भर देण्यात आला आहे. ओपन-ऍक्सेस ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरची भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वीज वापराचे रिअल-टाईम मोजमाप मिळणार असून, अंदाजे बिलिंगची गरज संपणार आहे. त्यामुळे बिलिंग अधिक पारदर्शक आणि अचूक होणार आहे. याशिवाय, दिवसाच्या वेळेनुसार वीज दर लागू करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना ऊर्जा वापराचे नियोजन करता येणार आहे.
www.konkantoday.com




