
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये राष्ट्रीय सागरी दिन उत्साहात साजरा


रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले शिरगाव (रत्नागिरी) येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये मे. मरीन सिंडीकेट लिमिटेड, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि जलजीविका यांच्या संयुक्त विद्यमाने ६ एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात आला. या निमित्त “राष्ट्रीय सागरी दिन २०२६: सागरी वारसा, संधी आणि शास्वत विकास” या विषयावर एक दिवसीय ‘कार्यशाळा आणि सागरी नौका नयन प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, त्यानंतर महाराष्ट्र गीत तसेच विद्यापीठ गीत गायनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे (नागपूर) माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. एस. चांडगे, भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे माजी प्रमुख डॉ. दिलीप नागवेकर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी शहरचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, जिल्हा समन्वयक सहयोगी ऋषिकेश भाटकर, तसेच आयोजक मरीन सिंडीकेटचे संचालक मरिनर दिलीप भाटकर, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मरीन सिंडीकेटच्या संचालिका श्रीम. संज्योक्ती सुर्वे उपस्थित होत्या. यावेळी कोंकण शिल्प मासिकाच्या सागरी दिन निमित्त विशेष अंकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. केतन चौधरी यांनी समुद्र ही आपल्या कोकणासाठी आणि देशासाठी सुद्धा नैसर्गिक देणगी असून, देशाच्या विकासासाठी महत्वाचा हातभार लावत असून “सक्षम प्रगती” कडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले केले. मरिनर दिलीप भाटकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मरीन सिंडीकेट तर्फे गेली ३६ वर्षे रत्नागिरीमध्ये ‘सागरी दिन’ साजरा केला जात असून त्यापैकी ३६ वर्षे कोकण कृषी विद्यापीठाची मत्स्य विद्या शाखा आपल्या सोबत असल्याची आठवण करून दिली. यावर्षी प्रथमच सागरी दिन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे साजरा करीत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ‘सागरी दिनाचे महात्म्य’ उपस्थतांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सागरी दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी उत्कृष्ट सागरी प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजनबाबत प्रशंसा केली.
मार्गदर्शन व्याख्यानामध्ये प्रथम रत्नागिरी माऊंटेनिअरचे सदस्य असिम फाउंडेशनचे (पुणे) राधेय पंडित यांनी ‘रत्नागिरीचा सागरी इतिहास’ यावर मार्गदर्शनपर सादरीकरणासह व्याख्यानात भाट्ये, रत्न-दुर्ग किल्ला, पेठकिल्ला, जयस्तंभ याबाबत ऐतिहासिक माहिती उपस्थितांना सांगितली. त्यानंतर प्रा l. डॉ. आसिफ पागरकर यांनी समुद्र शेवाळचे मानवासाठी महत्त्व तसेच समुद्र शेवाळ पासून विविध खाद्य पदार्थ तसेच औषधी पदार्थाबाबत माहिती दिली. त्यानंतर ऋषिकेश भाटकर आणि जलजीविका संस्थेचे जिल्हा समन्वयक चिन्मय दामले यांनी महाराष्ट्र शासन अंतर्गत कांदळवन कक्षाच्या योजनाबाबत माहिती दिली. गिअर टेकनीशिअन डॉ. एस. सी. कांबळे यांनी महाराष्ट्र शासनाने ५४ मत्स्य जातींसाठी किमान कायदेशीर आकार (एम.एस.एल.) जाहीर केले आहे, त्याबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी शाश्वत मत्स्य व्यवसायाचे महत्त्व सांगितले. शेवटी संजीव लिमये यांनी रत्नागिरीतील सागरी पर्यटन विषयी उपस्थितांना माहिती दिली.
सागरी नौका नयन प्रदर्शनामध्ये मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमार्फत विविध सागरी नौका नयन यंत्रे, मच्छीमारी नौका, सागरी सुरक्षा उपकरणे यांचे प्रदर्शन मांडले होते. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राने सागरी मत्स्यालय प्रदर्शित करून सहभाग नोंदविला, तर २-महाराष्ट्र नेव्हल बटालिअन, रत्नागिरीच्या कॅडेटसनी विविध सागरी नौका आणि जहाजांचे मॉडेल प्रदर्शन मध्ये ठेवले होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक डॉ. आर. आर. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक सौ. अपूर्वा सावंत यांनी केले. या कार्यशाळेस एकूण ९० विविध मान्यवर, अधिकारी कर्मचारी मत्स्य व्यवसाईक, मच्छिमार बांधव आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम कॅप्टन दिलीप भाटकर, आणि डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. प्रा. डॉ. आसिफ पागारकर, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, श्रीम. ए. एन. सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे डॉ. राकेश जाधव, प्रा. निलेश मिरजकर, प्रा. रोहित बुरटे, सुशील कांबळे, पंकज सिडाम, संदेश चव्हाण, चिन्मय दामले व श्रीम. सृष्टी सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.




