रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आंबा बागायतदारांना चुकीच्या किटकनाशकांमुळे झालेल्या नुकसानीबाबत महत्त्वाची बैठक

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चुकीची किंवा भेसळयुक्त किटकनाशके/औषधे पुरवठा झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाठविलेल्या पत्रानुसार संबंधित औषध कंपन्या, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि बाधित शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता पद्मश्री सभागृह, कृषी आयुक्तालय, पुणे येथे होणार आहे.
चुकीच्या, भेसळयुक्त किटकनाशक/ औषधांच्या वापरामुळे आंबा पिकावर गंभीर विपरीत परिणाम दिसून आला असून फळगळ, झाडांची हानी तसेच मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना अनेक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यासाठी ही विशेष बैठक होणार असून, आंबा बागायतदारांच्या हिताचे रक्षण, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय, तसेच भविष्यात अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरविणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असेल.

या बैठकीत चुकीची/भेसळयुक्त औषधे पुरविणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी,
शेतकऱ्यांना झालेला आर्थिक तोटा,
विविध कंपन्यांच्या विक्री दरांतील मोठ्या तफावतीमुळे होणारी आर्थिक पिळवणूक
यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांनी त्यांच्या जिल्ह्यात किटकनाशके पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच संबंधित शेतकरी प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button