
बसणीत वीज गेल्यावर खंडित होणाऱ्या बीएसएनएल नेटवर्कचा प्रश्न सुटणार
ठाकरे युवासेनेच्या पाठपुराव्याला यश : युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची तत्परता
रत्नागिरी : तालुक्यातील बसणी गावात वीज पुरवठा खंडित झाला की बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प होण्याच्या समस्येची युवासेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गंभीर दखल घेतली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी यासंदर्भात संबंधित बीएसएनएल अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर, यापुढे बसणी गावात नेटवर्कची समस्या जाणवणार नाही, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बसणी परिसरात गेल्या काही काळापासून वीज जाताच मोबाईल टॉवरचा बॅकअप संपत असल्याने संपर्क यंत्रणा कोलमडून पडत होती. यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब युवासेना उपविभाग प्रमुख आराध्य महेश नेवरेकर यांनी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली.
प्रसाद सावंत यांनी तत्काळ बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या तांत्रिक समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील ग्राहकांना अखंडित सेवा मिळणे हा त्यांचा हक्क असून, बॅकअप यंत्रणेतील त्रुटी तातडीने सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. युवासेनेच्या या सकारात्मक पाठपुराव्यानंतर प्रशासनाने दखल घेत, बसणी गावातील नेटवर्क सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
युवासेनेच्या या पुढाकारामुळे बसणीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आराध्य नेवरेकर आणि प्रसाद सावंत यांचे आभार मानले आहेत.




