
आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाजरत्न पुरस्कार प्रदान
आबलोली ) : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ समाज रत्न पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले.
दिशा महाराष्ट्राचीतर्फे आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १५ मार्च रोजी राज्यातील सुमारे ५० नामवंत महिलांचा राज्यस्तरीय माता सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा तसेच राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.
या सोहळ्यात सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांना सानपाडा (नवी मुंबई) येथे टेकिया अध्यक्ष आणि स्पंदन प्रकाशनचे संपादक चंद्रकांत जगताप यांच्या हस्ते राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन “दिशा महाराष्ट्राची”चे तुषार नेवरेकर, संचालिका सौ. सपना नेवरेकर यांनी केले होते.
सरपंच सौ. नेटके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर गुहागर तालुक्यातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.




