मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल मोजतोय शेवटची घटका:तत्काळ दुरुस्तीची रहिमान दलवाई यांची मागणी


चिपळूण–गुहागर मार्गावरील मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून, तो अक्षरशः शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असतानाच त्याची दयनीय अवस्था नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी व्यक्त केली आहे.

गुहागर–विजापूर हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरील मिरजोळी येथील पूल ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता. अनेक दशकांपासून हा पूल वाहतुकीचा मुख्य आधार राहिला आहे. मात्र, कालांतराने देखभालीअभावी पुलाची रचना कमकुवत झाली असून, सध्या तो धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. या मार्गावरून दररोज टँकर, डंपर, ट्रक, एसटी बस तसेच लहान-मोठी वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. वाढत्या वाहतुकीच्या ताणामुळे पुलाची झीज अधिकच वाढली आहे. पुलावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.“पुलाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याआधीच प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुरुस्ती किंवा नव्याने पूल उभारण्याची गरज आहे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून, संभाव्य दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button