मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर; गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच चाकरमान्यांचे हाल!


ठाणे ते वाशी प्रवासाला दोन तासांहून अधिक; पनवेल, माणगाव, इंदापूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा


मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढत असतानाच मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच हजारो खासगी वाहने आणि विशेष गाड्या कोकणाच्या दिशेने रवाना झाल्याने मुंबई-गोवा महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहनांची अक्षरशः गर्दी झाली आहे.

ठाणे परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा वळण रस्ता, शिळफाटा-महापे मार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता आणि खारघर परिसरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ठाणे ते वाशी हे नेहमी काही मिनिटांत पार होणारे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तब्बल दोन तासांहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांचा संताप वाढला.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी आणि त्यातच कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला. याचा फटका ठाणे परिवहन सेवेच्या वाहनांनाही बसला. रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलावर रिक्षा आणि इतर वाहनांसाठी प्रवाशांना तब्बल २५ ते ३० मिनिटे प्रतीक्षा करावी लागली.

पळस्पे पुलावर अवजड वाहनांमुळे वाहतूक ठप्प

पनवेलजवळील पळस्पे पुलाच्या परिसरात अवजड वाहनांमुळे वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला. मुंबई-गोवा महामार्गावरही वाहनांची संथगती कायम राहिल्याने कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांना तासनतास रस्त्यावरच अडकून राहावे लागले.

दरम्यान, माणगाव आणि इंदापूर परिसरातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अवघे पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना एक तासापेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे चित्र होते.

खासगी वाहनांची संख्या वाढली

यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारच्या रात्री हजारो विशेष तसेच खासगी वाहने कोकणाच्या दिशेने रवाना झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत सुमारे १५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महामंडळाने जाहीर केलेल्या जादा गाड्यांनाही मोठा प्रतिसाद मिळाला असून बहुतांश गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. अनेक गाड्यांचे आरक्षण यापूर्वीच पूर्ण झाले होते. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण आणखी वाढला.

अवजड वाहनांमुळे संतापात भर

गणेशोत्सवाच्या काळात अवजड मालवाहू वाहनांवर निर्बंध असतानाही काही ठिकाणी मालमोटारी आणि रासायनिक टँकर रस्त्यावर दिसून आल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर झाल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली. उत्सवासाठी मोठ्या अपेक्षेने कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांना प्रवासाच्या सुरुवातीलाच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने वाहतूक नियोजन अधिक प्रभावी करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button