
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, तुर्तास मुंबईत येण्याच्या निर्णय स्थगित; सरकारला दिला ३ महिन्यांचा वेळ!
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पहाटे २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले.
सरकारच्या शिष्टमंडळाने बीडमधील पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रसाद लाड आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. यानंतर सकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन उपोषण सोडल्याची घोषणा करण्यात आली.
सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला. या काळात मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही मुंबई गाठणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. उपोषण आज स्थगित करत असलो तरी आंदोलन सुरूच राहणार, असेही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.




