
वादामुळे चिडलेल्या महिलेने शेजार्याच्या घरात सोडला चक्क जिवंत विंचू
महिलेने शेजार्याच्या घरात सोडला चक्क जिवंत विंचू
शेजार्यांमधील वादातून एकमेकांवर राग काढण्याचे अनेक प्रकार समोर येतात; मात्र रत्नागिरीत वैमनस्यातून चक्क जिवंत विंचू शेजार्याच्या घरात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाचणे येथील श्रीराम नगर परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी ७२ वर्षीय महिलेविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील नाचणे येथील श्रीराम नगर परिसरातील ’सार्थ सावरी’ बंगल्यात स्नेहा संदीप गुरव (४५) या आपल्या मुलीसह राहातात. शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ च्या सुमारास स्नेहा गुरव आणि त्यांच्या शेजारी राहणार्या प्रीती पद्माकर मयेकर (७२) यांच्यात काही कारणावरून वाद झाला.
तक्रारीनुजार, या वादानंतर प्रीती मयेकर यांनी चक्क जिवंत विंचू झाडूच्या सहाय्याने उडवत स्नेहा गुरव यांच्या बंगल्याच्या मुख्य गेटच्या आत टाकला. घराच्या प्रवेशद्वाराजवळ जिवंत विंचू फेकण्यात आल्याने गुरव कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विंचवाचा दंश झाल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रकारामुळे घरातील व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.




