
मनसेच्या पुढाकाराने माकडांचा बंदोबस्त; वन विभागाकडून ६ माकडे जेरबंद, ग्रामस्थांनी मानले वनविभागाचे आभार,
राजापूर : तालुक्यातील वडद हसोळ आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. या समस्येकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वडदहसोळ (राजापूर) च्या वतीने वन विभाग राजापूरचे गांभीर्यपूर्वक लक्ष वेधण्यात आले.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजापूरचे वन अधिकारी श्री. बावधने साहेब यांची भेट घेऊन परिसरातील माकडांचा वाढलेला उपद्रव आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. या निवेदनाची तात्काळ दखल घेत अधिकारी बावधने साहेब यांनी वन अधिकारी श्री. निलेश गुरव आणि त्यांच्या संपूर्ण टीमला वडद हसोळ येथील पळसमकरवाडी येथे तत्परतेने रवाना केले.
वन विभागाच्या टीमने पळसमकर वाडी येथे विशेष मोहीम राबवत माकडांना पकडण्यासाठी पिंजरा लावला. या मोहिमेत वन कर्मचाऱ्यांना यश आले असून तब्बल ६ माकडांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात हलवण्यात आले आहे.
वन विभागाने तात्काळ कारवाई करत माकडे पकडल्यामुळे पळसमकर वाडीतील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माकडांमुळे होणारा त्रास आणि पिकांचे होणारे नुकसान आता काही अंशी थांबण्यास मदत होणार आहे. वन अधिकारी बावधने साहेब, श्री. निलेश गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल मनसे पदाधिकारी तसेच पळसमकर वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने वन विभागाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.




