
अंजणारी पुलावर मालवाहू ट्रक पलटी होऊन पेटला; दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी पुलावर शनिवारी सायंकाळी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावर पलटी झाला. ट्रक पलटी होताच त्याने अचानक पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीचे मोठे लोट उसळले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या अपघातात ट्रकमधील दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले.
या अपघातामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या




