रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प,

एसटीसह प्रवासी अडकले मुसळधार पावसाचा फटका; सातारा जिल्ह्यातील १५ ते २० गावांचा रत्नागिरीशी संपर्क तुटला

खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी दरड कोसळून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी सातारा जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरीशी संपर्क तुटला असून, घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
दरड कोसळलेल्या ठिकाणी खेड–अकलपे एसटी बस गेल्या दीड तासांहून अधिक काळ घाटातच अडकून पडली आहे. या बसमध्ये शालेय विद्यार्थी, महिला आणि इतर प्रवासी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घाटमाथ्यापलीकडील गावांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांनाही रस्त्यातच थांबावे लागले असून, पुढे कसे जायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात याच ठिकाणी डोंगराचा मोठा भूभाग खचून रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. त्यानंतरही या परिसरात धोका कायम असतानाच पुन्हा मुसळधार पावसामुळे डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाणी आणि माती रस्त्यावर आली.
धबधब्यांनी विक्राळ रूप धारण केल्याने रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असून, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी संबंधित यंत्रणा घटनास्थळी रवाना होत असून, हवामानामुळे मदतकार्याला अडथळे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रघुवीर घाटातून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button