
शहर स्वच्छ ठेवणार्या सफाई कर्मचार्यांच्या निवासस्थानाची दुरावस्था
एकीकडे रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, दुसरीकडे शहर स्वच्छ ठेवणार्या सफाई कर्मचार्यांचे जीवन मात्र आजही अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. आधुनिक इमारती, चकचकीत रस्ते, सुशोभित दुभाजक आणि स्मार्ट सिटीच्या घोषणा यामागे दडलेले हे वास्तव आता नागरिकांनाही अस्वस्थ करणारे ठरत आहे.
रत्नागिरी नगरपरिषद आता वातानुकूलित आणि भव्य प्रशासकीय इमारतीत कार्यरत असली, तरी आयटीआय आठवडा बाजार परिसरातील पालिकेच्या कर्मचारी वसाहतीतील सफाई कर्मचार्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी या कर्मचार्यांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या अवघ्या ’सहा बाय सहा’च्या छोट्या खोल्यांमध्ये आजही अनेक कुटुंबे राहात आहेत.
अर्धशतक उलटून गेले, शहा बदलले, सुविधा वाढल्या; मात्र या कर्मचार्यांचे आयुष्य त्याच पडक्या आणि असुरक्षित घरांमध्ये अडकून पडले आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात घरांचे संरक्षण करण्यासाठी रहिवाशांना ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक घरांची छपरे गळत असून, भिंती कमकुवत झाल्या आहेत. परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्याचाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
www.konkantoday.com




