
दोन महिने वीजबिल थकल्यास वीजपुरवठा होणार बंद; महावितरणची स्मार्ट मीटरद्वारे नवी व्यवस्था
मुंबई : महावितरणकडून राज्यभर स्मार्ट प्रीपेड आणि पोस्टपेड मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. या स्मार्ट मीटरमुळे वीजपुरवठा बंद झाल्याची माहिती थेट नियंत्रण कक्षाला मिळणार असून तक्रार करण्याची गरज कमी होणार आहे.
दोन महिन्यांचे वीजबिल थकल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित केला जाणार आहे. तसेच प्रीपेड मीटरचे रिचार्ज संपल्यासही वीजपुरवठा तत्काळ बंद होईल. मात्र, ऑनलाइन बिल भरल्यानंतर वीजपुरवठा लगेच सुरू करण्यात येणार आहे.
याशिवाय, मीटर रीडिंग आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार असून वीजबिल थेट मोबाईल किंवा ई-मेलवर पाठवले जाणार आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना रिअल-टाइम अपडेट, ऑनलाइन पेमेंट आणि जलद सेवा मिळणार असल्याचे महावितरणने सांगितले.




