
देशभरात जुलैपासून ‘ जी राम जी ‘ ची सुरूवात, मनरेगा कायदा रद्द होणार!
मुंबई : विकसित भारत – रोजगार हमी आणि उपजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच विकसित भारत – जी राम जी ची कायद्याची अंमलबजावणी देशभरात एक जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारने आज, ११ मे रोजी अधिसूचना जारी केली आहे.
मनरेगा कायदा रद्द होणार
विकसित भारत जी राम जी कायदा लागू होत असल्यामुळे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) २००५ त्या दिवसापासून रद्द होईल. नवीन रुपरेषेनुसार ज्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्य स्वेच्छेने अकुशल शारीरिक काम करण्यास तयार असतील, त्या कुटुंबाला प्रत्येक आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या वेतन रोजगाराची वैधानिक हमी मिळण्याचा हक्क असेल.
मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार
मजुरांना वेळेवर आणि पारदर्शी पद्धतीने मजुरीचे पैसे दिले जाणार असून, कामगारांना त्यांच्या बँक खात्यात किंवा पोस्टाच्या खात्यात थेट लाभ रक्कम जमा होईल. मजुरी साप्ताहिक आधारावर किंवा हजेरी नोंद (मस्टर रोल) बंद झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत दिली जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे न झाल्यास, कामगारांना कायद्यातील तरतुदींनुसार विलंबाबद्दल भरपाई मिळणार आहे. या योजनेसाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये केंद्र सरकारने ९५,६९२.३१ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.




