*रत्नागिरीः-* रत्नागिरी येथे "श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी" या संस्थेतर्फे एकदिवसीय ज्योतिष संमेलन आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
या विशेष सोहळ्यात सौ. सुप्रिया भारस्वाडकर पुणा यांना "ज्योतिर्विद्या वाचस्पती" या महत्त्वपूर्ण पदवीने सन्मानित करण्यात आले.ज्योतिषशास्र विषयावर अपार मेहनत घेऊन सातत्याने नवनवीन विषय आत्मसात करणाऱ्या त्यांच्या कार्याला या निमित्ताने नवीन झळाळी मिळाली आहे.
सौ. सुप्रिया यांनी "कुंडलीतील राहू केतू आणि वास्तुदोष" या विषयावर "ज्योतिर्विद्या वाचस्पती" या उच्चतम पदवीसाठी प्रबंध सादर केला. या शोधप्रबंधात सुमारे १०१ जातकांच्या कुंडल्या आणि त्यांच्या वास्तुचे नकाशे त्यांनी अभ्यासले आहेत. यामध्ये कुंडलीमध्ये राहूकेतूमुळे जे दोष आढळत आहेत, ते दोष वास्तूमध्ये देखील आहेत का ? असतील तर त्याचा कुंडलीत राहूकेतू असलेल्या स्थानांशी, दिशांशी काही संबंध आहे का ? त्या दिशांमध्ये वास्तूमधील कुठल्या गोष्टी आहेत ? अशा सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून त्याचे विश्लेषण व निष्कर्ष मांडण्यात आला आहे.या प्रबंधात त्यांनी सखोल अभ्यासनीय विवेचन करुन ज्योतिषशास्रात एक अमुल्य ठेवा निर्माण केल्याने त्यांना या बहुमोल पदवीने सन्मानित करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि ब्रह्मचैतन्य ज्योतिष ज्ञानपीठाचे कुलपती डॉ. प्रसन्न मुळ्ये, कुलगुरू आचार्य श्री. राधेश बादले पाटील उपस्थित होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अनंत आगाशे, गुरुश्री प्रिया मालवणकर, श्री. हरीश जोशी, डॉ. शैलेश देशपांडे, श्री. जितेंद्र दाते, श्री. श्रीनिवास रामदास,या मान्यवरांसह संस्थेचे सर्व सदस्य, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमात सौ. विवा साठे यांना "मुखचर्या व शरीरभाषा यांचा समुपदेशन प्रक्रियेतील वापर" या मुखचर्या शास्त्रातील विषयावरील शोधप्रबंधासाठी ज्योतिर्विद्या वाचस्पती ही पदवी प्रदान करून सन्मानित केले गेले.
या पदवीदान संमारंभात सौ.सुप्रियाताई भारस्वाडकर यांनी प्रथमतः संस्थेचे आभार मानले.आणि ज्योतिषशास्र विषयाचा गाढा अभ्यास असणाऱ्या आपल्या मातोश्री यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.यापुढे आपण अविरतपणे ज्योतिषशास्र विषयक नवनवीन माहिती आणि ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.महाराष्ट्रभर व्याप्ती असणाऱ्या संस्थेच्या वतीने पदवी मिळाल्याने विशेषतः टिळक सावरकरांच्या भूमीत हा सोहळा झाल्याने माझ्या जीवनातील अनमोल क्षण असल्याचे सौ.भारस्वाडकर यांनी सांगितले.