
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील वाघबीळ ते आंबा या सुमारे ३५ किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ ते शाहूवाडी तालुक्यातील आंबा या सुमारे ३५ किलोमीटरच्या पट्ट्याची अक्षरशः चाळण झाली असून, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.या जीवघेण्या रस्त्यामुळे संतप्त झालेल्या ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ने प्रशासनाला तीव्र इशारा दिला असून, येत्या आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास महामार्ग बंद करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ ते आंबा हा घाटवळणाचा मार्ग सध्या मोठ्या आणि खोल खड्ड्यांनी भरला आहे. यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, अपघातांची मालिकाच सुरू झाली खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने अपघातग्रस्त होत आहेत. यात अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत, तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला असून, वाहनचालक आर्थिक भुर्दंडामुळे त्रस्त झाले आहेत.




