
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दापोलीचा सन्मान..
कवी कैलास गांधी यांना कवीसंमेलानाचे निमंत्रण, गझल मुशायऱ्याचे अध्यक्षपद
दापोली :-सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दापोलीच्या साहित्यविश्वाला सन्मान प्राप्त झाला असून येथील जेष्ठ कवी आणि गझलकार कैलास गांधी यांना २ जानेवारी २०२६ रोजी मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या कवी संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले असून ते कोकणचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याच बरोबर त्यांना ३ जानेवारी २०२६ रोजी तेथील गझल कट्ट्यावर होणाऱ्या ६ व्या गझल मुशायऱ्याच्या अध्यक्षपदाचा सन्मान देखील देण्यात आला आहे.*
दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या थाटामाटात होत असून यामध्ये परिसंवाद, कविसंमेलन, काव्य कट्टा, गझल कट्टा, ग्रंथ प्रदर्शन तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. १ जानेवारी २०२६ रोजी संमेलनाचे उद्घाटन होणार असून ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पहिले कविसंमेलन मुख्य मंचावर होणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर भूषवणार आहेत. या कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून कैलास गांधी यांना बोलावण्यात आले आहे.
३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता गझल कट्ट्यावर होणाऱ्या ६ व्या गझल मुशायऱ्याच्या अध्यक्षपदाचा बहुमान देखील कैलास गांधी यांना देण्यात आला असून याचे गझलकार संदीप पटेल सूत्रसंचालन करणार आहेत. तर राज्यभरातील आत्माराम जाधव (परभणी), अरुण देसाई (धुळे), नरेंद्र पाटील(पुणे), विजय देशमुख (धाराशिव), गोविंद हाके (बीड), भालचंद्र कुलकर्णी , डॉ. धन्वंतरी कुलकर्णी (सातारा), आदेश कोळेकर (पुणे) आदी गझलकार सहभागी होणार आहेत.




