
कोकण रेल्वेतून गणपतीबाप्पांच्या सुबक मूर्तींसह चाकरमान्यांचे गावाकडे वाजतगाजत प्रयाण.
येवा कोकण आपलोच असा, गणेशोत्सवात आपला स्वागत आसा, आपलो प्रवास सुखाचा व्हवदे, गणेशोत्सवात आपला घर आनंदान भरादे, असा प्रेमळ आणि आपुलकीचा आमंत्रण आता मुंबयच्या चाकरमान्यांका येवक लागला आसा. आता सर्वानाच वेध लागलेत ते 7 सप्टेंबरपासून सुरु होणार्या गणेशोत्सवाचे. दहा दिवस चालणार्या या गणेशोत्सवासाठी गावी जाण्याची लगबग आता प्रत्येक चाकरमान्यांना लागली आहे. रविवारी हजारो गणेशभक्तांनी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकातून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत कोकण रेल्वेतून गणपतीबाप्पांच्या सुबक मूर्तींसह गावाकडे वाजतगाजत प्रयाण केले. गणेशभक्तांच्या आगमनामुळे कोकणातील गावागावात चैतन्य निर्माण होऊ लागले आहे.