भाटकरवाड्यात मध्यरात्री तीन दुचाकी जाळल्या, पोलिसांकडून कसून तपास सुरु.

रत्नागिरी: शहरानजीकच्या भाटकरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तीन दुचाकी जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवत आरोपींचा शोध सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० च्या दरम्यान भाटकरवाडा येथे हा प्रकार घडला. यामध्ये गाडी मालक मिरकर फजल, निहाल मुल्ला आणि इम्तियाज मिरकर यांच्या एक बुलेट, एक ॲक्सेस आणि एक ॲक्टिवा अशा तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस पथकही उपस्थित होते.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.या घटनेमुळे भाटकरवाड्यातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी येऊन वाहने जाळण्याचे धाडस केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले की, ” अज्ञात व्यक्तीने दुचाकी जाळल्या आहेत. सर्व तपास करून आरोपींचा शोध घेतला जाईल. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”या परिसरात सकाळी पोलिसांनी रुट मार्च देखील केला. आणि नागरीकांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.या घटनेमागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे की, अन्य काही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button