
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण महत्त्वाचे : पद्मश्री दादा इदाते
रत्नागिरी : “जमिनीमधल्या पाण्याचा स्तर वाढवून भविष्यकाळासाठी शाश्वत स्रोतांची तरतूद करणे हे पर्यावरणीय समतोल साधण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि स्वयंस्फूर्तीने प्रयत्न केल्यासच समतोल विकास साधला जाईल,” असे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी व्यक्त केले.
जल जीवन मिशन अंतर्गत स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ हा कार्यक्रम २ जून ते ५ जून या कालावधीत आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप मर्चंडे, शाखा अभियंता श्रेया सावंत ग्रा पा.पु., मुख्य संसाधन केंद्रांचे प्रतिनिधी अनिरुद्ध फळणीकर, मंगेश नेवगे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी श्री. मंडलिक यांनी जलजीवन मिशन आणि त्या अनुषंगाने येणारी प्रशिक्षणे यांचे महत्त्व विशद करून लोकांच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच उत्कृष्ट नियोजनाबद्दल आणि प्रशिक्षणासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नंबद्दल मुख्य संसाधन केंद्रातील प्रतिनिधींचे आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले.
प्रमुख अतिथी दादा इदाते यांनी केंद्राच्या जलजीवन मिशन योजनेचे महत्त्व विशद केले. ही योजना पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत २०४७’ या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वच्छतागृहांच्या अभावी मुलींनी शाळेत जाण्याचे कमी असलेले प्रमाण पाण्याच्या उपलब्धतेमुळे वाढल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. तसेच ही योजना म्हणजे पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी आणि पर्यावरण संवर्धन या गोष्टींचा भारतीय संस्कृतीशी परंपरेने असलेला संबंध सांगत त्यांनी कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षणासाठी दापोली तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्राम पाणीपुरवठा आणि स्च्छता समितीचे सदस्य उपस्थित होते.