
कोकणातील शेतकऱ्यांना शेती भाजवण नुकसान भरपाई मिळावी.
बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांची सरकारकडे मागणीआबलोली : कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन पेरणी पूर्व कामाच्या दिवसांत अवकाळी अतिवृष्टी झाल्याने भाजवणी केलेली शेतीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रति गुंठा सहा ते सात हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी बळीराज सेनेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, तालुका अध्यक्ष अरुण भुवड, तालुका सचिव ॲड. दिनेश कदम यांच्या सह्या आहेत. या मागणी बाबतचे निवेदन गुहागर तालुका बळीराज सेनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.कोकणातील शेतकरी पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत करतात. भाजवणीसाठी आर्थिक ताण पडतो. भाजवण झाल्यावर रोहिणी नक्षत्रामध्ये पेरणी होते; मात्र मान्सून येण्याआधीच कोकण भागात झालेल्या मुसळधार पावसाने भाजवण केलेली शेती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरासरी पहाणी करून पंचनामे करून सरकारने प्रति गुंठा सहा हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड, तालुका सचिव ॲड. दिनेश कदम व सर्व कार्यकारणी सदस्य यांनी निवेदनद्वारे केली आहे.