
आम्हीच गद्दारांचे नामोनिशाण मिटविले- मंत्री उदय सामंत यांचा दावा.
काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उतरती कळा लागलेल्या शिवसेनेला थोडा आधार मिळाला आहे. पण आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी, आम्ही कोकणात गद्दारांचे नामोनिशाण मिटवले असा टोला लगावला आहे. ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी कोकणासह राज्यात ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष केलं होतं. यामुळे अनेक माजी आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली होती. तर पक्ष फुटीचे लोन हे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून थेट ग्रामपंचायतपर्यंत पोहचले होते.
दरम्यान कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात मंगळवारी प्रवेश करत शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यावर सामंत यांनी पलटवार केला आहे.उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार असून याच्याआधी त्यांनी कोकणातील गद्दारांना संपवा असे वक्तव्य केलं होतं. यावर सामंत यांनी, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये आता गद्दार उरलेच नाहीत. या तिन्ही जिल्ह्यात विधानसभेला महायुतीच्या 15 पैकी 14 जागा आल्या आहेत. यामुळे आम्हीच गद्दारांचे नामोनिशाण मिटवल्याचा दावा सामंत यांनी केला आहे.