मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट!

अलिबाग : रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) फुटीच्या उंबरठ्यावर आहे. जयंत पाटील यांच्या पक्षांतर्गत एकाधिकारशाहीला कंटाळून पाटील कुटुंबातील एक गट भाजपच्या वाटेवर आहे. ‘शेकाप’चे माजी जिल्हा चिटणीस आणि मीनाक्षी पाटील यांचे चिंरजीव आस्वाद पाटील, माजी आमदार सुभाष पाटील यांचे चिरंजीव सवाई पाटील यांच्यासह अनेक मोठे नेते येत्या काही दिवसांत भाजपच्या कंपूत दाखल होण्याची शक्यता आहे.

मीनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबातील वाद विकोपाला गेले. पंढरपूर येथील ‘शेकाप’च्या अधिवेशनात या वादाची ठिणगी पडली. पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या नियुक्तीवरून सुभाष पाटील यांनी पक्षातील मनमानी कारभाराबाबत पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली. यानंतर विधानसभा निवडणुकीत सुभाष पाटील यांना अलिबागमधून उमेदवारी नाकारण्यात आली. जिल्हा चिटणीस यांना डावलून जयंत पाटील यांनी सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला.

निवडणुकीनंतर आस्वाद पाटील यांनी आपल्या पाठीराख्यांना एकत्र करत जिल्हा चिटणीसपदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यानंतर ‘शेकाप’चे माजी आमदार आणि भाजपचे राज्यसभेतील विद्यामान खासदार धैर्यशील पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लवकरच भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button