
मिर्या बंधार्याचे उर्वरित काम अजूनही ठप्पच, ठेकेदाराकडून चालढकल.
मिर्या धुपप्रतिबंधक बंधार्याच्या अपूर्ण राहिलेल्या १२०० मीटरच्या टप्प्याचे काम अजूनही ठप्प आहे. पत्तन विभागाने काम सुरू करण्याचे आदेश तीन आठवड्यापूर्वी देवूनही ठेकेदार काम सुरू करण्यास चालढकल करत असल्याचे पत्तन विभागाने सांगितले. या पावसाळ्यात बंधार्याचा काही भाग वाहून गेला आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत काम न झाल्यास जयहिंद चौक ते पांढरा समुद्र किनारी भागाला समुद्राच्या उधाणाचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे बंधार्याचे काम केव्हा सुरू होणार याकडे मिर्यावासियांचे लक्ष लागले आहे. मिर्या धुपप्रतिबंधक बंधार्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे.
सुमारे साडेतीन किमीचा हा बंधारा असून त्यापैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे. पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे. परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. या टप्प्याचे काम करताना यंत्रसामुग्रीची ने-आण करण्यासाठी लागणार्या जागेवरून वाद निर्माण झाला होता. जागा मालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. हे काम व्हावे यासाठी स्थानिकांनी पत्तन विभागाला निवेदनही दिले. परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर काम थांबले होते. www.konkantoday.com