
रावारी-बापेरे ग्रामपंचायतीमधील दलितवस्तीचा निधी हडप केल्याचा आरोप
लांजा : तालुक्यातील रावारी-बापेरे ग्रामपंचायतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण जयंती दलितवस्ती नळपाणी सुधार योजनेचा मंजूर झालेला निधी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेविका यांनी संगनमताने काम न करताच हडप केल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे सदस्य धर्मदास कांबळे आणि प्रवीण साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या शाखा व उपअभियंता यांचीही याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी असणार्या संबंधित सरपंच व ग्रामसेविका यांच्यावर तत्काळ चौकशी व्हावी अन्यथा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी जिल्हा परिषद येथे आमरण उपोषणाचा इशारा धर्मदास कांबळे, प्रवीण साळुंखे यांनी लांजा येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, रावारी-बापेरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बौद्धवाडी येथे जुनी नळपाणी योजना सन 2011 ते 2012 साली पूर्ण झालेली आहे. त्यानंतर चालूवर्षापर्यंत म्हणजेच सन 2022 पर्यंत संबंधित योजनेवर कोणताही नवीन डागडुजी खर्च शासन निधीतून झालेला नाही. दरम्यान, 2016 ते 2017 या आर्थिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण जयंती दलितवस्ती नळपाणी सुधार योजनेसाठी याच बौद्धवाडीसाठी निधी मंजूर झाला. हा निधी मंजूर झाल्यानंतर या योजनेचे कोणत्याही प्रकारचे काम बापेरे दलितवस्तीत झालेले नाही. असे असताना ग्रामपंचायत खात्यात या योजनेअंतर्गत जमा झालेला 2 लाख 63 हजार 490 रुपयांचा निधी परस्पर अदा केल्याने बौध्दवाडीतील दलितवस्ती लाभार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.