
जिल्ह्यातील 230 ’एटीएम’मध्ये बसवणार सीसीटीव्ही यंत्रणा
रत्नागिरी : बँकांच्या एटीएम सुरक्षेसाठी जिल्ह्यातील 230 एटीएममध्ये अत्याधुनिक अशी सीसीटीव्ही सिस्टीम बसवण्यात यावी, असा पत्रव्यवहार पोलिस दलाकडून बँकांना करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिली. चिपळूण येथे एटीएम फोडून 14 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. यातील चोरट्यांना 24 तासांत ताब्यात घेण्याची कामगिरी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केली आहे. मात्र, यानंतर एटीएमच्या सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी बँकांना काही सुरक्षा नियमावलीबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांची काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. ग्रामीण भागात काही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा नाही. तसेच बर्याच एटीएममध्ये सिक्युरिटी गार्ड नाहीत. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.




