
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न दीक्षित यांची गळफास घेऊन आत्महत्या; नऊ दिवसांनी आंब्याच्या बागेत आढळला मृतदेह
लांजा : भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रसन्न दीक्षित यांचा मृतदेह सोमवारी २२ ऑगस्ट रोजी रावारी आणि बापेरे गावच्या सीमेवर असलेल्या आंब्याच्या बागेत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नऊ दिवसांपासून ते बेपत्ता होते. लांजा तालुक्यातील रावारी ब्राह्मणवाडी येथील रहिवासी असलेले प्रसन्न रामकृष्ण दीक्षित (वय ५०) हे घरगुती भांडणातून दि. १२ ऑगस्ट रोजी घरात कोणालाही न सांगता सकाळी निघून गेले होते. त्यामुळे कुटुंबीय आणि गावातील नागरिक, लोकांनी त्यांचा सर्वत्र शोधाशोध करूनही त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांच्या वतीने प्रसन्न दीक्षित हे बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती . अखेर सोमवारी २२ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्याच आंब्याच्या बागेत पेरूच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. आंबा बागेत काम करणाऱ्या कामगारांना कुजल्याचा वास आला. ही गोष्ट गावातील लोकांना समजली. त्यानंतर सोमवारी सकाळी बापेरे व लावणारी गावातील लोकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पदाधिकारी असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू आदींसह अनेक नेत्यांशी त्यांचा थेट संवाद होता. याशिवाय भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदचे सदस्य होते. याशिवाय लांजातील अनेक संस्थांमध्ये कार्यरत होते.